वागळे परिसरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करा- पालकमंत्री एकनाथ शिंदे
सर्वाधिक ७१ रुग्ण सापडल्याने कोरोनाच्या महामारीत वाढ
ठाणे
ठाण्यातील वागळे प्रभाग समितीच्या हद्दीत १५ ते २३ एप्रिल या कालावधीत १९ रुग्ण आढळून आले. लॉकडाउन आणि संचारबंदीनंतरही नागरिक रस्त्यावर, दुकानांमध्ये, भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लॉकडाउन करूनही काहीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे करोना महामारीचा धोका वाढू लागला आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून आवश्यक प्रयत्नही करण्यात येत आहेत. तरीही नागरिकांचे रस्त्यावर फिरणे बंद झाले नाही. ज्या परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तो भाग सील केला आहे. तरीही रस्त्यावरील नागरिकांची संख्या जैसे थे आहे. अखेर पालिका प्रशासनाने रविवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ३ मे रात्री १२ वाजेपर्यंत किसननगर भटवाडी, गणेशचौक, शिवटेकडी, किसननगर २, ३, रोड नंबर १६, रोड नंबर २२ या परिसरात नागरिकांच्या वावर संपूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या परिसरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
या सर्व परिस्थितीबाबत २२ एप्रिल रोजी पोलिस अधिकारी आणि पालिका अधिकारी यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत भटवाडीसह गणेश चौक, शिवटेकडी, किसननगर नंबर ३ हा परिसर संपूर्ण बंद न करता सकाळी ७ ते १० या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवण्याविषयी ठरले होते. दहा वाजल्यानंतर दुकान उघडलेले आढळल्यास दुकान सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपाययोजनेनंतरही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि नगरसेवकांकडून हा परिसर पूर्णपणे बंद करण्याची मागणी होऊ लागली होती.
जिल्ह्यात १३ एप्रिल रोजी सर्वात जास्त ४६ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर बरोबर १३ दिवसांनी सर्वाधिक ७१ रुग्ण सापडल्याने कोरोनाच्या महामारीत वाढ झाली आहे. नव्या ७१ रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७00 कडे सरकत आहे. कल्याण-डोंबिवलीत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नवी मुंबईत रविवारी २० रुग्ण आढळून आले असून त्यापाठोपाठ ठामपा आणि मीरा-भाइंदर येथे प्रत्येकी १७, केडीएमसी-१२, भिवंडी-२, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आला आहे. नवी मुंबईतील ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू २२ एप्रिलला ठामपाच्या कळवा रुग्णालयात झाला. कोरोना अहवाल रविवारी आल्याने त्याच्या मृत्यूची नोंद रविवारी करण्यात आली. या रुग्णामुळे नवी मुंबईतील मृत रुग्णांची संख्या पाच झाली असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या २० झाली आहे.
0 टिप्पण्या