आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी नवी मुंबईतील महिलेविरुद्ध आयटी अॅक्ट द्वारे गुन्हा दाखल
नवी मुंबई:
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाने गैरसमजुतीने तिघांची हत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात राजकीय वातावरण तापलं असताना, खारघरमध्ये रहाणाऱ्या एका महिलेने पालघर येथे घडलेल्या झुंडबळीच्या घटनेचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर शेअर करून दोन वर्गांमध्ये शत्रुत्व व द्वेशभाव निर्माण करण्याचा तसेच महाराष्ट्र शासनाची बदनामी करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे आढळून आले आहे. याबाबतची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला मिळाल्यानंतर सायबर सेलने संबंधित महिलेचा शोध घेतला असता, तृप्ती देसाई ही महिला खारघरमध्ये रहात असल्याचे तसेच ती इन्शूरन्स एजंट असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात स्वत: फिर्यादी होऊन या महिलेविरुद्ध आयटी अॅक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर काही राजकिय पक्ष व संघटनांनी सदरची हत्या ही विशिष्ट वर्गाने केल्याचा आरोप करून या घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकरण बरंच तापलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सदर हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या शंभरहून अधिक लोकांना अटक करून त्यात कुणीही विशिष्ठ वर्गातील व्यक्ती सहभागी नसल्याचे उघडकीस आणले आहे. मात्र त्यानंतर देखील खारघर येथे रहाणाऱ्या तृप्ती जयवंत देसाई या महिलेने पालघर येथील साधूंच्या हत्येचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर शेअर करुन महाराष्ट्र सरकारने याचे उत्तर द्यायलाच हवे, अशी पोस्ट टाकली आहे.
या पोस्टमध्ये तृप्ती देसाई हिने, आम्हाला महाराष्ट्राचा पाकिस्तान बनवायचा नाही. महाराष्ट्रासारख्या संतभूमीमध्ये पालघर येथे महंतांची हत्या करण्यात येते, ते देखील पोलिसांसमोर, ठाकरे सरकार ह्याबद्दल काहीच का बोलत नाही? असा सवाल करत संबंधित फेसबुक पोस्टमध्ये राज्य सरकारबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. त्याचवेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे लिखाणही करण्यात आले आहे. त्यावर काही व्यक्तींनी आपल्या कमेंट्स देताना विशिष्ट समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील आढळून आले.
0 टिप्पण्या