बहुजन संग्राम संघटनेकडून १७० कुटुंबांना शिधा- किराणाचे वाटप
मुंबई
कोरोनामुळे केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या लॉक डाऊनच्या काळात रोजगार बंद असलेल्या गरीब श्रमजीवी लोकांना बहुजन संग्राम या संघटनेतर्फे शिधा आणि किराणा वस्तूंचे वाटप अनेक महानगरांमध्ये सध्या सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात बुधवारी कांदिवली पूर्व येथील क्रांती नगर, महात्मा फुले चाळ येथे 170 कुटुंबांना बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्या हस्ते शिधा- किराणाचे वाटप करण्यात आले. या संघटनेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला 14 एप्रिलपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. कांदिवलीतील क्रांती नगर येथे गरजूंना मदत वाटप करतेवेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बौद्धांचार्य बबन येडे, सुदाम कटारे,रमेश केदार, दीपक सावन्त,रवि जाधव, भीमराव कांबळे, संदिप कदम, जितेश लाखनकर हे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी बहुजन संग्रामकडे सर्व स्तरातील हितचिंतकांकडून आर्थिक आणि वस्तूरूपाने मदतीचा ओघ सुरू आहे,असे सांगून भीमराव चिलगावकर यांनी दात्यांना धन्यवाद दिले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जीजाबाई वासरे, इंदुबाई मोरे, कमल मानमोडे, आशा बोर्डे, कालिंदा केदारे, शोभा जाधव, स्नेहा सावंत आदी कार्यकर्ते मदत संकलन आणि वाटपासाठी परिश्रम घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात हातावर पोट असलेल्या 200 कुटुंबांना शिधा- किराणाचे वाटप करण्यात आले होते. या मदत वाटपाचा दुसरा टप्पा बुधवारी पार पडला असून हा उपक्रम लॉक डाऊन संपेपर्यंत म्हणजे 3 मे पर्यंत राबवला जाणार आहे, असे बहुजन संग्राम महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई कांबळे यांनी सांगितले. बहुजन संग्रामतर्फे मुंबई,ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महानगरांमध्ये नाका कामगार, मोलकरणी, निराधार महिला, विधवा, परित्यक्ता या घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे, अशी माहिती बहुजन संग्रामचे मुंबईतील संघटन सचिव विनोद कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
0 टिप्पण्या