तिरुपती मंदिर प्रशासनाला लॉकडाऊनच्या काळात ४०० कोटी रुपयांचं नुकसान
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु आहे. तो टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशात लॉकडाऊन सुरु आहे. याचा परिणाम देशातील विविध मंदींरांवर देखील झाला आहे. अनेक देवस्थानांचे यामुळे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक असणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान, मंदिर प्रशासनाला लॉकडाऊनच्या काळात जवळपास ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. परिणामी मंदिर व्यवस्थापन समितीने 1300 कंत्राटी कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या कर्मचार्यांचे कंत्राट 30 एप्रिल रोजी संपले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे मंदिर बंद करण्यात आल्याने, त्याचा परिणाम उत्पन्न कमी होण्यावर झाला. यातूनच प्रशासनाने 1 मेपासून या कर्मचार्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यास नकार दिला.
तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने 1300 कंत्राटी कर्मचार्यांना 1 मेपासून कामावर येऊ नका, असे सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे कामच बंद असल्यामुळे आता या 1300 कर्मचार्याचे कंत्राट पुढे वाढवणार नसल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले. तिरुमला तिरुपती देवस्थानम् ट्रस्टकडून तीन अतिथीगृह चालविले जातात. विष्णू निवासम्, श्रीनिवासम् आणि माधवम् अशी या तीन अतिथी गृहांची नावे आहेत. नोकरीवरून कमी करण्यात आलेले सर्व 1300 कर्मचारी याच अतिथीगृहांमध्ये अनेक वर्षांपासून कामाला होते.
परिणामी शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर १७ मार्चपासून साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद असलं तरी भक्तांना साईबाबाचं ऑनलाईन दर्शन घेता येत आहे. भक्तांकडून साईचरणी ऑनलाईन माध्यमातून दानही करण्यात येत आहे. १७ मार्च २०२० ते १६ मे २०२० या ६० दिवसांच्या कालावधीत २१ हजार ६४९ साईभक्तांकडून ऑनलाईनद्वारे दान करण्यात आलं आहे. साई भक्तांकडून ३ कोटी २२ लाख १० हजारांहून अधिक रुपयांची देणगी देण्यात आली आहे. साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शिर्डीत साईंच्या चरणी भक्तांकडून वर्षभरात जवळपास ६०० कोटी रुपयांचं दान केलं जातं. म्हणजेच जवळपास दररोज १ कोटी ६४ लाख रुपयांहून अधिक दान दिलं जातं. मात्र लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळांच्या देणगीवरही याचा परिणाम होतो आहे.
देशातील आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. याचा फटका सर्वच स्तरांतील संस्थानांना बसला आहे. धार्मिक स्थळांच्या दान पेट्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन कसं द्यावं असा मोठ्या प्रश्न मंदिर प्रशासनाला पडला आहे. या काळात शिर्डी संस्थानाने गुंतवणुकीच्या आलेल्या पैशातून कर्मचाऱ्यांना वेतन दिलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील मंदिरात पडून असलेल्या सोन्याचा कोरोना विरूद्धच्या लढाईत वापर करण्याची सुचना काय केली, हजारो स्वंयघोषीत धार्मिक तज्ञांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टिकेची झोड उठवली. परंतु या बिकट परिस्थितीत देवाचे धन मानव जात वाचवण्यासाठी उपयोगात आणण्याची सूचना अगदी योग्य आहे.माझ्या मते धर्माचा धंदा करणाऱ्या लोकांनी चव्हाणांच्या सुचनेचे स्वागत केले पाहिजे.कारण कोरोना हे एक असे वैश्विक संकट आहे की त्याला कोणत्याही मंदिरातील देव थोपवू शकला नाही.त्यामुळे लोकांचा देवावर आणि दैवी शक्तीवर भविष्य काळात किती विश्वास राहिल या बाबतीत शंकाच आहे.आजच्या परिस्थितीत सामान्य लोक विषाणू संसर्गामुळे बेहाल असतांना तिरुपती देवस्थानचे 400 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात झळकत आहेत.म्हणजे याचा अर्थ असा की, देवाचा धंदा करणाऱ्यांना (आणि देवाला) तुमच्या सुख दुःखाचे काही देणे घेणे नाही.
म्हणून धार्मिक इंडस्ट्री चालवणारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुचनेची ताबडतोब अंमलबजावणी केली पाहिजे कारण संकट समयी देव नाही तर देवाचे धन, देवाचा पैसा माणसाच्या कामी आला अशी भावना सामान्य लोकांची होईल. आणि या संकटातून मानव जात सही सलामत बाहेर आली तर भविष्यातील धर्माच्या धंद्यात या मदतीचा निश्चितच फायदा होईल .
0 टिप्पण्या