वेगळ्या विदर्भवाद्यांची तकलादू भूमिका....
२८ सप्टेंबर १९५३ च्या नागपूर करारानुसार विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी जोरकसपणे पुढे आली आहे. विकासाच्या बाबतीत विदर्भाला नेहमी सापत्न वागणूक मिळते आणि कापूस, कोळसा, वीज या तीन घटकांच्या बळावर विदर्भ स्वतंत्रपणे स्वतःचा विकास करू शकेल असा विश्वास वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना आहे. त्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. अनेक राजकीय नेतेही या आंदोलनात सहभागी होते. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जांबुवंतराव धोटे, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, इत्यादी अनेक नावे त्यात आहेत.
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत. १९९७ च्या भुवनेश्वर येथील भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यांनतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला. अगदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नितीन गडकरींनी स्वतंत्र विदर्भासाठी हमी दिली होती. मार्च २०१० मध्ये सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर येथून तर देवेंद्र फडणवीसांनी शेगाव येथून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी युवा जागर यात्रा काढली होती. भाजपने तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात विदर्भ जनजागरण यात्रेचा समारोप केला होता.
यापेक्षा विशेष बाब म्हणजे २००४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची घोषणाही केली होती, ही माहिती विदर्भ राज्य समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्याकडून मिळाली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता रानडे यांची पहिली भेट देवेंद्रांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी झाली होती. त्यावेळी पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तासभर गप्पा रंगल्या. त्यांनतर देवेंद्रांनी अमृताला “तू काजोल सारखी दिसतेस” असे म्हणून प्रपोज मारला होता. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अमृता या नागपूरमधील डॉ.चारु रानडे आणि नेत्रतज्ञ डॉ.शरद रानडे यांच्या कन्या आहेत. देवेंद्र दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मार्च २००५ मध्ये दोघांचे लग्न झाले.
0 टिप्पण्या