काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना परिवारासह मंदिर प्रवेश बंदी
नवी दिल्ली
कोरोनामुळे अडचणीत असलेल्या उद्योगधंदे, नोकरदार, मजूर वर्गाला दिलासा देण्यासाठी त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या देवस्थान ट्रस्टमधील सोनं ताब्यात घेण्याच्या विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतानी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनीही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचंही महंतांनी म्हटलं आहे.
World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात 1 ट्रिलियन डॉलर (किंवा 76 लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने 1 किंवा 2 टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
'काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच 1983 मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली होती. या चोरीत काँग्रेसची मुख्य भूमिका होती', असा आरोप काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि डॉ. कुलपती तिवारी यांनी केला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. ते पूर्वाग्रहानं ग्रासलेले आहेत असंही तिवारी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर अनेकांनी सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका केली. तसेच, काही भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं. चव्हाण यांनी स्वतः ट्विटरवरुन याबाबत खुलासा केला आहे. देशातील सर्वच धर्मांच्या देवस्थानातील सोन्याबद्दल मी दिलेल्या सूचनेचं, काही भक्त मीडियाने विपर्यास वृत्तांकन केलं. सन 1999 मधील अटलबिहारी वायपेयी सरकारच्या काळातच, देशात सोने तारण योजना सुरू करण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. तर, मोदी सरकारने 2015 मध्ये या योजनेचं नामांतर केलं आहे. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार, अनेक देवस्थानांनी त्यांचे सोने तारण ठेवले आहे. त्यामुळे, माझ्या वक्तव्याचा हेतुपूर्वक विपर्यास करणाऱ्यांवर मी कारवाई करणार असल्याचेही चव्हाण यांनी टिटरवरुन सांगितले आहे.
0 टिप्पण्या