बहुजन संग्राम तर्फे पालघर जिल्ह्यात ३०० आदिवासी बांधवांना शिधा-किराणा वाटप
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अभिनव उपक्रम
ठाणे
पालघर या आदिवासी बहूल जिल्ह्य़ातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या अतिदुर्गम तालुक्यातील आदिवासी बांधवांना बहुजन संग्राम या महाराष्ट्र व्यापक सामाजिक, विधायक सेवाभावी संघटनेने कोरोनाच्या संकट काळात हातावर पोट असलेल्या ५ हजार श्रमिक, गोरगरीब, आदिवासी बांधवांसाठी शिधा-किराणा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तिसर्या टप्प्यात १ मे महाराष्ट्र दिनी बहुजन संग्राम तर्फे तिसऱ्या टप्प्यात ३०० आदिवासी गरजू बांधवांना बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भीमराव चिलगांवकर यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बहुजन संग्रामच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई कांबळे, संघटन सचिव विनोद कांबळे, पालघर जिल्हा सरचिटणीस विष्णू वाघ, संघटक मुकुंदराव जाधव उपस्थित होते. २ ते ५ मे या कालावधीत बहुजन संग्राम तर्फे पालघर जिल्ह्यात दिड हजार आदिवासी बांधवांना प्रत्येकी १२ किलो किराणा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व वृत्तदर्शन मिडीया सर्व्हीसेसचे कार्यकारी संपादक भीमराव चिलगांवकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
१४ एप्रिल पासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत गेल्या दोन आठवड्यात शिधा - किराणा वाटपाचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यात कांदिवली (पूर्व) येथिल क्रांतीनगर या चाळी आणि झोपडपट्टीच्या मुंबई उपनगरात पहिल्या टप्प्यात २०० तर दुसर्या टप्यात १७० कुटुंबांना प्रत्येकी १२ किलो तांदूळ, गहु, दाळ, गोडेतेल, साखर, मसाला, पोहे, कांदे अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
लॉकडाऊनची मुदत १७ मे पर्यंत असली तरी त्यानंतर हटला व कायम जरी राहीला तरी परीस्थिती लगेचच पूर्व पदावर येईल अशातला भाग नाही. यापुढील काही काळ कोरोना सोबतच आपणांस काढावा लागेल हे प्रधानमंत्री परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करीत आहे. त्यामुळे पुढील काळातही हातावर पोट असलेल्या नाका कामगार, बांधकाम मजूर, मोलकरणी, निराधार महिला, विधवा, परीत्यक्ता या घटकांना समाजातून पाठबळ मिळण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे सारी भिस्त सरकारवर न टाकता स्वयंसेवी संस्था - संघटना आणि सुस्थितीत असलेल्या नागरिकांनी मदतीचा ओघ बंद पडू देवू नये असे कळकळीचे आवाहन बहुजन संग्राम संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रंजनाताई कांबळे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मुहूर्तावर केले आहे.
जूनमध्ये सुरू होणाऱ्या पावसाळ्यात तर हातावर पोट असलेल्या वर्गाची रोजगाराअभावी अधिकच दैना होण्याचा धोका समोर उभा आहे. त्यामुळे आमच्या बहुजन संग्रामने हाती घेतलेले मदत कार्य परीस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत म्हणजे पावसाळा संपेपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव विनोद कांबळे यांनी केले आहे.
त्यानुसार १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी पालघर या आदिवासी बहूल जिल्ह्य़ात आपल्या मदत कार्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी आज रोजी पालघर जिल्ह्यातील ३०० आदिवासी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून येत्या ५ मे पर्यंत सुमारे दिड हजार आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा बहुजन संग्रामचा संकल्प आहे असे बहुजन संग्रामचे पालघर जिल्हा सरचिटणीस विष्णू वाघ यांनी दिली आहे.
कोरोनाच्या जागतिक संकटाच्या फेर्यात सापडलेल्या जनसामान्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून आधार देण्याच्या या कार्याला आपण सर्व दात्यांनी हातभार द्यावा असे कळकळीचे नम्र आवाहन भीमराव चिलगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0 टिप्पण्या