कामगार कायद्यातील बदला विरोधात कामगार संघटनांचा उद्या देशव्यापी निषेध
मुंबई
भारत देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, ओडिसा, महाराष्ट्र, राज्यस्थान, बिहार आणि पंजाब या राज्यातील सरकारने लॉकडाऊनचा फायदा घेऊन कारखाना अधिनियम १९४८ मधील तरतुदीचे उल्लंघन करून दैनंदिन कामाच्या तासात ८ वरुन १२ तास अशी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये कामगार कायद्यांना स्थगिती देऊन कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल केले आहेत सदर निर्णयाविरोधात मा. डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सर्व श्रमिक संघटनांचे नेते राजघाट, नवी दिल्ली येथे दि. २२ मे २०२० रोजी उपोषण करणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनचा गैरफायदा घेत केंद्र सरकारने व अनेक राज्यातील सरकारांनी कामाचे तास ८ वरून १२ करणे, कामगार कायद्यांना स्थगिती देणे, कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करणे अशाप्रकारे कामगारांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे याविरोधात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डाॅ.जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सर्व केंद्रीय श्रमिक संघटनांच्या वतीने उद्या २२ मे, २०२० रोजी काळी फीत लावून कामगार विरोधी धोरणाचा निषेध दिन पाळण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले.
निषेध दिन पाळण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक दि.२० मे, २०२० रोजी झुम अपवर व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली असून महाराष्ट्र इंटकला संलग्न असलेल्या २८८ संघटना उद्या निषेध दिनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एस.टी., एम.एस.ई.बी., कोल, रेल्वे, पोर्ट, औद्योगिक क्षेत्रातील, सिमेंट, केमिकल, मिल, महानगरपालिका, माॅईल, बीएसएनएल, बीडी, बँक यासह विविध क्षेत्रातील कामगार सामाजिक सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) पाळून कायदेशीर मार्गाने कामावर असताना खिशाला काळी फीत लावून निषेध दिवस पाळण्यात येणार आहे.
या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये राष्ट्रीय सचिव श्री. महेंद्र घरत,प्रदेश सरचिटणीस मुकेश तिगोटे, प्रविण वाजपेयी,मुंबई अध्यक्ष दिवाकर दळवी,ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे,महिला प्रमुख सौ. भाग्यश्री भुर्के,अनिल गणाचार्य, दत्तात्रय गुट्टे,निवृत्ती देसाई,सुनिल देसाई, सुरेश सुर्यवंशी, लक्ष्मणराव घुमरे,प्रदीप वखारीया, मनिष पांढरे, राधेश्याम जयस्वाल, रोशन तांबोळी, संदीप सुर्यवंशी, वैभव पाटील, पी.के.रामण, उपेंद्र पाटील, अमित भोसले, संजय पाटील आदी पदाधिकारी यांनी बैठकीत मतं मांडून उपस्थिती दर्शवली तसेच निषेध दिन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाम सांगितले.
0 टिप्पण्या