संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई
कोरोना या विश्वव्यापी महामारीच्या काळात संचार बंदीमुळे महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याची माहीती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या स्वगावी सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे व़डेट्टीवार म्हणाले.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी याबाबत चर्चा केली असून त्यांनी स्नाचारबंदीमुळे विविध जिल्ह्यात अडकलेल्याना त्यांच्या स्वगावी पोहचविण्यासाठी परिवहन बसेस देण्यास परवानगी दिली आहे. १० हजार मोफत बसेस द्वारे संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात पोहचविण्याचे काम उद्यापासून सुरु होईल. याबाबतचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचे काम, आवश्यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचे काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले
संचारबंदीच्या काळात परराज्यात अडकलेल्या देशभरातील स्थलांतरित मजुरांना मूळगावी परतण्यासाठी कराव्या लागणाऱ्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करेल, अशी घोषणा सोनिया गांधी यांनी केली होती. त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गडचोरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५०० मजुरांच्या रेल्वे तिकिटाची सोय केली आहे. तसेच आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेल्या लोकांना त्यांच्या स्वगावी जाता यावे म्हणून स्वखर्चायातून सीमाभागात गाड्या पाठवल्या असून शहर व जिल्हा काँग्रेसच्या १२ लाख रुपये मदतीतून दोनशे ते अडीचशे बसेस ची व्यवस्था केली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
0 टिप्पण्या