मजूर कुणी मारला?
अपघातासोबतच सामूहिक आत्महत्याची दाट शक्यता...
औरंगाबाद करमाडजवळ १६ मजूर मालगाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडले. यामागे अनेक प्रश्न निर्माण झालेत. मजूर पटरीवर झोपले आणि मेले एवढा हा साधासरळ विषय नाही. २१ जण पटरीवर कसे झोपू शकतात? कुणालाही कसे वाटले नाही ट्रेन येईल? ही सामूहिक आत्महत्या का असू नये? मजुरांमध्ये अफाट निराशा, जिकडे तिकडे अंधार, खिश्यात पैसे नाहीत, भूक लागली तर खायला काही नाही, असा अवस्थेत हे प्रकरण केवळ एक अपघात म्हणून घोषित करून मोकळं होणं हे दुर्दैव आहे.
पायी निघालेल्या मजुरांची कुणी विचारपूस करत नाही, त्याला कुणी आधार देत नाही, मजुरांना मजुरांच्या स्तिथीवर सोडल्यामुळे तो उधिग्न अवस्थतेत आहे. असल्याची खंत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केली आहे.
आपण निघालोत घरी परंतु पोहोचतोय की नाही ? पोहोचलोच तर तिथे येऊ देतात की नाही? असे हजार प्रश्न डोक्यात घेऊन मजूर निघालेला आहे. आज जो तो आपला जीव वाचवण्यात मग्न आहे. पोलिसांच्या भीतीपोटी घाबरलेले रेल्वे पटरीने पायी निघालेले आहेत. त्याला केवळ मरण दिसू लागले आहे. यामुळे हा अपघात असला तरी याकडे सामूहिक आत्महत्यांच्या दृष्टीने सुद्धा पाहीलं पाहिजे. या मजुरांना 25 लाख रुपये प्रत्येकी केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. रेल्वे बंद असल्यातरी पटरीवर मालगाड्या चालू आहेत पटरीवरून चालू नये असा प्रचार केलेला नाही. त्यामुळे पियुष गोयल या निष्क्रिय रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. यापुढे पायी जात असलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सरकारने पाऊल उचलावेत.
विदेशात अडकलेल्याना केंद्र सरकार विशेष विमानाने आणते परंतु ज्यांच्या घामावर आणि खांद्यावर हा देश आहे त्यांना वाचवण्यासाठी कसलेही प्रयत्न नाहीत. मजूर हा या देशाचा कणा आहे त्याची ही वाताहात निंदनीय आहे. त्याची ही मानवनिर्मित झालेली हत्याच आहे. विदेशात अडकलेल्याना आणण्यासाठी वंदे मातरम मोहीम राबवणाऱ्या केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे. आपल्याच देशात मजूर चिरडत आहे त्यांना वाचवण्यासाठी का कोणती मोहीम राबवली जात नाही? असा प्रश्न दिपक केदार यांनी केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात हाताला रोजगार नाही मग पोट कसं भरणार ? हा प्रश्न मजुरांसमोर उभा ठाकलायं. अशावेळी गावी जाण्याचाच पर्याय समोर असून मजुरांनी गावी जाण्याची वाट देखील धरली. विश्रांतीसाठी रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर मालगाडीखाली चिरडले गेल्याची बातमी समोर आली. देशभरातून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे.
चुकीच्या रस्त्याने जात असल्याचे पोलीस आम्हाला म्हणतात. पण आमच्यासाठी खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. स्पेशल ट्रेन पाठवणार असे सरकार म्हणतेय पण तशी व्यवस्था काही दिसून येत नाही. अशावेळी आम्ही पायी जाऊ नाहीतर काय करु ? असा प्रश्न मजूर उपस्थित करत आहेत. ही दुर्घटना झाल्यानंतरही रेल्वे रुळामार्गे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. खाण्यासाठी लोकं जे काही देतात त्यातून आम्ही कसातरी दिवस काढतो.
औरंगाबाद-जालना मार्गावर करमाडजवळ पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद-जालनादरम्यान हे सर्व मजूर रुळांवर झोपले होते. जालनाहून भुसावळकडे पायी जाणारे मजूर, मध्यप्रदेशला निघाले होते. हे मजूर रेल्वे रुळांच्या बाजूने चालत होते. मात्र थकवा आल्याने मध्येच आरामासाठी ते रुळांवरच झोपले असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी या घटनेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. मजुरांची योग्य ती काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. पायी प्रवास करण्याची वेळ मजुरांवर का आली ? , त्यांनी रेल्वे रुळ मार्गाचा पर्याय का निवडला ? मजूर रेल्वे रुळावर का झोपले होते ? असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत.
0 टिप्पण्या