वगसम्राट दादू इंदुरीकर गाढवाचं लग्न या वगनाटयातील सावळया कुंभार भूमिकेमुळे आजही जनसामान्यांवर राज्य करीत आहे. त्यांच्या स्मृती जपण्याचं काम अश्वघोष आर्ट्स अॅन्ड कल्चरल फोरमचे जयराम जाधव आणि त्यांच्या टीमने काही वर्षापूर्वी हाती घेतलं होतं. दोन-तीन वर्षे व्यवस्थितरित्या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मात्र नेहमीप्रमाणे आर्थिक विवंचनेमुळे हा स्मृतिकार्यक्रम बंद पडला. या कार्यक्रमासाठी जयराम जाधव खूप आग्रही होते. दोन वर्षे त्यांनी नेटाने हे कार्य केले. मात्र कार्यक्रमासाठी लागणारं आर्थिक पाठबळ कोणत्याही बड्या नेत्याने अथवा तत्सम संस्थांनी दिले नाही. दोन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले, अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र केवळ शाब्दीक सहानुभूतीच्या पलिकडे कोणीही काहीही मदत केली नाही. या लोककलावंताच्या नावाने देण्यात येण्राया पुरस्काराला कोणीही प्रायोजकत्व दिले नाही. त्यामुळे हा कार्यक्रम बंद पडला. तळेगाव स्टेशन जसराज थिएटरच्या गाढवाचं लग्न या वगनाटयातील सावळया कुंभार भूमिकेमुळे लोककलेतील हिरा ठरलेले वगसम्राट दादू इंदुरीकर मावळच्या भूमीत जन्मले याचा महाराष्ट्रासह स्थानिकांना देखील विसर पडला. मात्र या वर्षी वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त जन्मगाव इंदुरी (पुणे जिल्हा ) येथे 13 जून रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात येण्राया या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कलाक्षेत्रातील व इंदुरीकर यांच्यावर प्रेम करण्राया जनतेने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तसा वगसम्राट दादू इंदुरीकरांचा जीवनप्रवास अद्यापही दुर्लक्षितच आहे. लोककलावंतांना प्रेरणादाई ठरावा असा राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त वगसम्राट दादू इंदोरीकर म्हणजे तमाशाच्या फडावरील एक हरहुन्नरी, अष्टपैलू आणि बहुआयामी कलाकार. पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यामध्ये तळेगावचाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीकाठी इंदोरीमध्ये जन्मलेल्या दादूंचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत झाले आणि कलगी-त्रुयातले ख्यातीप्राप्त कलाकार वडील राघोबांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेली इंदुरीकरांमधील सोंगाड्याची अभिजात कलाकारी या तमाशा कलावंतास राष्ट्रपति पारितोषिकापर्यंत घेऊन गेली. त्याकाळी अवघ्या महाराष्ट्राने दादू इंदुरीकर यांना अक्षरश: डोक्यावर घेतले होते.
मात्र दादू इंदुरीकर ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला कलेच्या माध्यमातून आपली ओळख करून दिली. आणि नुसतीच ओळख नाही तर राष्ट्रपती पदक खिशात घालून हे दाखवून दिलं की कलेच्या क्षेत्रात आम्हीच वरचढ आहोत. त्याची मत्तेदारी कुणाचीही नाही. अशा या व्यक्तीच्या नावाने कुठेही काहीही नाही. साधा त्याच्या नावाने शासनदरबारी एक पुरस्कारही नाही. मात्र काही जणांच्या जिवंतपणीच त्यांच्या नावाने पुरस्कार सुरु झाले. याला खरंच जातीवाद म्हणायचा की अजून काही. आजही गाढवाचं लग्न तितक्याच आवडीने ऐकलं जातं. इंदुरीकरांनी त्याला अशा उंचीवर नेऊन ठेवलं आहे की तिथपर्यंत अद्यापही कोणी पोहोचू शकलेलं नाही आणि भविष्यात तशी शक्यताही नाही. तरीही आज या राष्ट्रपती विजेत्या कलाकाराच्या नावाची अॅलर्जी का असावी. त्याच्या नावाने काही-काही नाही. कोणत्या नाट्यमंचाला, किंवा कोणत्या नाट्य पुरस्काराला त्याच्या नावाने संबोधण्यात आलं नाही. याचं कारण एकच हा वगनाट्य सम्राट तथाकथित उच्चवर्णिय समजण्राया समाजातील नव्हता. नाहीतर आज त्याच्या नावाने एकतरी नाट्यसंकूल उभारलं गेलं असतं. आणि इथेच आज जातीव्यवस्थेची पक्कड किती मजबूत आणि अजूनही किती खोलवर रुजली गेलीय हे दिसून येतं.
कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा मारणाऱया या तरुण मंडळींना अजुनही याचा गंध नाही. सर्व जगाने त्यांची विद्वत्ता स्विकारली असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला आजतागायत घटनेच्या सुत्रातून एकसंघ ठेवले मात्र त्यांचे ऋण न मानणारी आणि त्यांच्या विरोधात वेळ येताच गरळ ओकणारी इथली प्रस्थापित जातीयवादी मंडळीची मानसिकता स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर देखील तशीच आहे यापेक्षा या देशाचं दुर्दैव कोणतं असेल ?
रणजी ट्रॉफिमध्ये सचिन तेंडुंलकरच्या आधी विक्रमी धावसंख्या करणारा विनोद कांबळी जेव्हा कळत-नकळत भारतीय संघातून `आपोआप' बाद होतो, तेव्हा खरं तर त्याची जातच आडवी आलेली असते, हे मात्र जाणीवपूर्वक लपवल्या जातं. वैयक्तीक स्वार्थासाठी खेळण्रायांना `देशासाठी खेळतात' अशी विशेषणे देऊन प्रचंड प्रसिद्धी दिली जाते. असा दुसरा खेळाडू होणे शक्यच नाही असा आभास निर्माण केला जातो. ही देखील छुपी जातीव्यवस्थाच आहे. एका आदिवासीने मुंबई शहराला पुण्याचा मार्ग दाखवला मात्र त्या आदिवासीचे नाव मुंबई-पुणे महामार्गाला देण्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रस्थापिताचं नाव द्यायला कोणाला विचारावही लागत नाही. केवळ मंगेशकर कुटुंबियांना त्रास होतो म्हणून आजही त्यांच्या घरासमोरच्या उड्डाणपूलाचा प्रोजेक्ट शासनाने बासनात गुंडाळून ठेवला. मात्र शहरी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो कुटुंबांना बेघर करून त्यांना अन्नपाण्यावाचून तडफडायला लावणारी त्यांची जातच या झोपडीत राहण्रायांच्या मागे आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे या छुप्या जातीव्यवस्थेत घडत आहेत. काहीचा उहापोह होतो तर काही काळाच्या अंधारात गडप होतात याच जातीव्यवस्थेचा फटका अशा अनेक कलाकारांना त्यांच्याही नकळत बसला आहे. त्याचा दोष मात्र कधी कधी परिस्थीतीवर किंवा त्या त्या समाजावर टाकून ही मंडळी मोकळी होतात. खोलवर रुजलेल्या या जातीव्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही. प्रल्हाद शिंदे यांचे नाव नाट्यसंकुलाला देण्यासाठी प्रचंड उर्जा खर्ची करावी लागते. मागणी-मोर्चा आदी मार्ग पत्करावे लागतात. मात्र दिनानाथ मंगेशकर नाट्य संकुल सहजतेने निर्माण होतं ही आहे इथली छुपी जातीव्यवस्था! इथल्या जातीव्यवस्थेबद्दल सध्या निरनिराळ्या `एनजीओ' सारख्या सामाजिक संस्थांकडून आणि तत्सम संघटनांकडून जाणिवपूर्वक `पॉझिटीव्ह' विचारसरणी पसरवून ठेवली आहे. जेणेकरून छुप्या जातीव्यवस्थेबद्दल इथला तरुण अनभिज्ञ राहून त्या विरोधात लढा उभारणार नाही.
`गाढवाचं लग्न'द्वारे खरं तर दादूंनी इथल्या प्रस्थापितांना अनेक धक्के दिले. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागला. काही वर्षापूर्वी आलेल्या एका नाटकांमधून देव-धर्माची खिल्ली उडवल्यावरून त्या नाटकाचा बेरंग करून टाकण्याचं कुटील कारस्थान इथल्या कट्टरपंथीयांनी केलं. परंतु दादूंनी `देव सगळे रंडीबाज' असं म्हणून सगळ्या देवांना एकाच रांगेत बसवून टाकलं. पण त्यांनी केलेली संवादफेक आणि उभा केलेला एंकदर वगनाट्याचा फार्स पाहता या वगनाट्याविषयी काहीही न बोललेलं बरं म्हणून सर्वच मृग गिळुन बसले होते. मात्र दादूं गेल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे वगनाट्यही पुन्हा बाहेर येणार नाही याची पुरेपूर काळजी प्रस्थापितांनी घेतली. सुरुवातीला काही काळ या नाटकाचे प्रयोग इतर कलाकारांनी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते जमलं नाही. आणि बरेचसे मुळ संवादही त्यांनी काढून टाकल्याने या नाटकाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. कारण शेवटी बाप तो बापच असतो. दादू इंदुरीकर यांनी आजरामर केलेली ही कलाकृती कोणत्या ऐdरयाग्रैयाला जमणारी नाहीच मुळी. दादू इंदुरीकर यांना मानाचा जयभीम....
0 टिप्पण्या