आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची प्रचार मोहिम जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजपने ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्यांचे उदिष्ट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांना पुढील प्रधानमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सर्वांनीच एकमुखाने मोदींचे नाव पुकारले. मात्र ते सर्व भाजप कार्यकर्ते होते. परंतु आता वर्धा शहरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंतच्या पदयात्रेत २०२४ मध्ये देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजेत असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिलांना केला. या प्रश्नावर वर्ध्यातील एका महिनेचा राग अनावर झाला. महिला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संतापल्या. महिला विरोधात बोलू लागताच बावनकुळेनी माईक खाली सरकावला. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
काही महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने खूप आधीच निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली असून मतदार संघनिहाय आढावाही घेतला गेला आहे. त्यासाठी आता भाजपकडून महाविजय २०२४ संकल्प यात्रेला सुरूवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपकडून राज्यभरात महाविजय २०२४ संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपकडून आज वर्ध्यात ‘संकल्प ते समर्थन’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना प्रधानमंत्री कोण पाहिजे म्हणून विचारताच या महिलांनी प्रचंड संताप व्यक्त केला. याबाबत पत्रकारांनी बावनकुळे पुढे गेल्यानंतर संतप्त झालेल्या महिलेला काय झालं व तुम्हाला काय पाहिजे, असं विचारलं असता, सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलिंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा संतप्त सवाल महिलेने केला. महिलेचा संतप्त अवतार पाहून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेथून काढता पाय घेतला व तरीही महिला शांत होत नसल्याचे पाहून तुम्ही स्टेजवर चला, आपण स्टेजवर बोलू अशी विनंती केली. यावर संतापलेल्या महिलेने स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला? असा प्रतिप्रश्न केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
0 टिप्पण्या