२८ मे २०२३ ला दिल्लीच्या शहाबाद डेअरी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. साक्षी नावाच्या एका १६ वर्षीय मुलीची साहिल नामक तरुणाने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. रहदारीच्या परिसरात ही घटना घडत असताना बाजूने अनेक जण ये-जा करत होते मात्र त्यापैकी कोणीच साक्षीच्या मदतीला धावून आला नाही. यावेळी जेवढी चर्चा या हत्याकांडाची झाली तेव्हढीच चर्चा माणसातील हरवत चाललेल्या माणुसकीची झाली. साक्षी मदतीसाठी जिवाच्या आकांताने विव्हळत होती; मात्र बाजूने जाणारे लोक तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे करत पुढे जात होते, हे साऱ्या देशाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहिले. त्यापैकी २-४ जण जरी साक्षीच्या मदतीला धावून गेले असते, तरी साक्षी आज जिवंत असती.
मात्र 'ती दुसऱ्याची मुलगी', 'माझी कोणीच नाही', 'मी का तिच्या मदतीला जाऊ', 'इतरही आजूबाजूला लोक आहेत ते जात नाहीत, तर मी का जाऊ ?' 'मी पुढे गेलोच तर उद्या पोलीस मला त्रास देतील, कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील त्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.' या वैचारिक वादळातून त्यावेळी आजूबाजूने जाणारे अनेक जण गेले असतील, पण त्यांच्या या विचारांच्या रणकंदनावर त्यांच्यातील विवेकाला मात करताच आली नाही. साक्षीच्या जागी माझी मुलगी, माझी बहीण असती, तरी मी असाच दुर्लक्ष करून पुढे गेलो असतो का, असा विचार त्यावेळी कोणाच्याच मनाला शिवला नाही परिणामी भर रस्त्यात साक्षीचा नाहक खून झाला या खुनाला हे बघेही जबाबदार आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार. आज ५ महिन्यानंतर साक्षी हत्याकांडाची पुन्हा एकदा आठवण जागी झाली. कारण दिल्लीतील मृतवत समाजाचा अनुभव पुन्हा एका निष्पाप तरुणाला आला. मानवातील मेलेल्या माणुसकीने पुन्हा एकाचा बळी घेतला.
पियुष पाल नावाचा एक ३० वर्षीय युवक नेहमीप्रमाणे दिल्लीतील आऊटर रिंग रस्त्याने मोटारसायकल वरून जात असताना मागून येणाऱ्या बाईकचा धक्का लागल्याने खाली पडून जखमी झाला. डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागून गंभीर जखमी झालेला पियुष लोकांकडे मदतीसाठी याचना करू लागला मात्र कोणीच त्याच्या मदतीला पुढे आले नाही. उलट काहीजण त्याचा व्हिडीओ बनवत राहिले. त्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरला, चोराने पियुषचा मोबाईल हिसकावला तेव्हा पीयूषच्या घरातून त्याच्यासाठी फोन आला होता मात्र चोरट्याने तो कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ करून तिथून पळ काढला. त्यावेळी तो फोन घेतला असता, तर कदाचित पीयूषच्या मदतीला त्याचे नातेवाईक धावून आले असते.
मात्र स्वार्थापुढे भावना मेलेल्यांना त्याचे सोयरसुतक ते काय असणार ! अर्धा तास रस्त्यावर विव्हळत पडलेल्या पियुषला अखेर पंकज जैन नावाच्या एका इसमाने अन्य ३-४ लोकांच्या मदतीने रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत माळवली होती. मृतवत समाजाचे दर्शन घडवणारी पाच महिन्यांच्या कालावधीत दिल्लीत घडलेली ही दुसरी घटना. अशा घटना केवळ दिल्लीत घडतात असे नव्हे. प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात हीच स्थिती आहे. मी भला आणि माझे घर भले, समाजात काही बरे वाईट घडतेय तर त्याचे मला काय ? अशी कूपमंडूक वृत्ती मानवांत तयार होऊ लागली आहे. आपणही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, किंबहुना समाजामुळेच आपले अस्तित्व आहे. समाजस्वास्थ चांगले राहिले तरच आपले स्वास्थ चांगले राहील. आज समाजातील एखाद्या घटकाच्या मदतीला आपण धावून गेलो तर उद्या समाज आपल्या मदतीला धावून येईल. हे आपल्या केव्हा लक्षात येणार ? शालेय जीवनात 'सारे भारतीय माझे बांधव आहेत' अशी प्रतिज्ञा आपण प्रतिदिन घेतो;
मात्र आपल्या बांधवांवर-भगिनींवर संकट ओढवते तेव्हा या प्रतिज्ञेचा आपल्याला विसर कसा पडतो ? भगवंताने मानवाला बुद्धी दिली आहे, मन दिले आहे, विवेकही दिला आहे, त्याचा वापर आपण केवळ आपल्या स्वार्थासाठीच करणार आहोत का ? इतरांना साहाय्य करण्याच्या गोष्टी आपण शालेय पुस्तकांत वाचल्या आहेत. गरजवंताला साहाय्य करण्याचे महत्व सांगणाऱ्या रिल्सही आपल्या मोबाईलवर पहिल्या आहेत; मात्र जेव्हा एखाद्या अनोळखी असह्हायत्याला मदत करण्याचा प्रसंगओढवतो, तेव्हा आपल्यातील माणुसकीची खरी कसोटी लागते. अशा कसोटीच्या प्रसंगांत देव सर्वांना सुबुद्धी देवो आणि पुन्हा कोणी साक्षी किंवा पियुष यांचा नाहक बळी न जावो !
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क : ९६६४५५९७८०
0 टिप्पण्या