देशातील बंधुता व सद्भावना टिकुन रहावी असे प्रत्येक भारतीय नागरिकास वाटत आहे. त्यासाठी प्रत्येक संस्था संघटना आपआपल्या परिने कार्य करीत आहे. याच हेतूने मौलाना आझाद विचार मंच व वाय खान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय एकता सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज देशभरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. समाजामध्ये एकमेकांविरुद्ध प्रचंड संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जातीतील सामान्य माणुस आज भितीच्या छायेखाली जगत आहे. जातीजातीचे राजकारण करून इथले राज्यकर्ते आपला हेतू साध्य करीत आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून या संमेलनामध्ये प्रत्येक जाती-धर्म-संप्रदायाच्या धर्मगुरूंना आणि विचारवंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक राम पुनियानी हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असल्याची माहिती वाय-खान फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी फैजुल्ला खान यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांना दिली. १८ फेब्रुवारी सायं. ५ वाजता झुला मैदान, आग्रीपाडा मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आमदार हुसेन दलवाई म्हणाले, २०१४ पासून देशातील अराजकता प्रचंड वाढली आहे. त्याला जबाबदार कोणत्या प्रवृत्ती आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. या प्रवृत्तीनी आज संपूर्ण देश काबीज केला असून भविष्यात सर्व सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. देशात हिन्दू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचे कार्य आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे. नव्हे एका संघटनेचा तो अजेंडाच आहे. केवळ त्या अजेंड्यावरच आज त्यांनी देशाची सत्ता काबीज केली आहे. सर्व सामान्य जनतेला धर्माच्या जाळ्यात अडकवून देशातील सर्व साधन संपत्तीचे अतोनात नुकसान करण्यात आले आहे. कालपर्यंत जी मंदीरे सर्वांसाठी खुली होती. त्या मंदीराच्या बाहेर आज येथे केवळ हिन्दुंनाच प्रवेश असे बोर्ड लावण्यात येत आहेत. यामागे प्रचंड द्वेष पसरवण्याचे राजकारण सुरु असून आज प्रत्येक भारतीय नागरिकाने या विरोधात आवाज उठवायला हवा. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दलवाई म्हणाले.
0 टिप्पण्या