- उत्तर मुंबई ‘स्लममुक्त’ करण्याच्या भाजपा नेते पियुष गोयलांच्या गॅरंटीवर कोण विश्वास ठेवणार? – सुरेशचंद्र राजहंस
- उत्तर मुंबईतील भूमिपुत्रांना बेघर करून पियुष गोयल बिल्डरचा ‘विकास’ करणार !
- निवडणुकीमुळे भाजपा व पियुष गोयल यांना झोपडपट्टीवासियांची आठवण झाली.
भाजपाचे उत्तर मुंबईचे लोकसभा उमदेवार व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार ही आपली गॅरंटी आहे, असे जाहीर केले आहे. गोयल यांना मागील १० वर्षात मुंबईतील झोपडपट्टी व त्यांच्या समस्या दिसल्या नाहीत आता लोकसभा निवडणुक असल्याने गोयल यांना गरिब झोपडपट्टीवासियांची आठवण झाली आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवरच लोकांचा विश्वास नाही तर पियुष गोयल यांच्या गॅरंटीवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल मुंबई विभागीय काँग्रेसच्या स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली त्यात नवे काहीच नाही. राहुल गांधी काहीच नाहीत असे म्हणणारे गोयल व त्यांचा भाजपा यांनी १० वर्षात राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी मोहीम चालवल्या पण त्यात त्यांना यश आले नाही. भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रेमुळे राहुल गांधी यांच्यावर जनतेचा विश्वास अधिक वाढला आहे. शत्रुला पाण्यातही धनाजी-संताजी दिसत तसे भाजपा, नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षातील लोकांना सदासर्वदा राहुल गांधीच दिसतात, असा टोलाही राजहंस यांनी लगावला.
धारावी अदानीच्या घशात घालून त्यांना बेघर करण्याचे षडयंत्र भाजपाने रचले आहे आता मुंबईतील इतर भागातील झोपड्यांवरही भाजपाची नजर गेली असून अदानी किंवा एखाद्या बिल्डरचा विकास करण्याचा कुटील डाव दिसत आहे. झोपडपट्टीतील लोकांना फसवण्याचा हा प्रकार आहे परंतु उत्तर मुंबईतील गरिब, सर्वसामान्य जनता भाजपा व पियुष गोयल यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. मोदींची गॅरंटी म्हणजे खोटारडी व फसवी असते. निवडणुका लागल्या की भाजपा असे चुनावी जुमले हवेत सोडत असते. मोदी यांनी दिलेली एकही गॅरंटी १० वर्षात पूर्ण केली नाही. २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल देण्याची नरेंद्र मोदी यांची घोषणा अजून पूर्ण झालेली नाही. मोदी सरकार ८० कोटी लोकांना मोफत राशन देते ही अभिमानाची गोष्ट नाही तर लाज वाटावी असा प्रकार आहे. मोदींचा विकास या ८० कोटी लोकांपर्यत पोहचलेला नाही, ५ किलो मोफत राशन देऊन ८० कोटी जनतेला गरिबीच्या खाईत लोटण्याचे पाप भाजपाने केले आहे. अरबपती लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल व गरिब आणखी गरिब कसा होईल हेच काम मोदी सरकारने १० वर्षात केले असल्याचेही राजहंस म्हणाले.
0 टिप्पण्या