: पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्काराने जेष्ठ पत्रकार मधु कांबळे यांचा आज शुक्रवार दि.19 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, जेष्ठ पत्रकार गुरुबीर सिंह, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, प्रेम क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष समर खडस, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. . यावेळी मुंबई प्रेस क्लब चे नवनिर्वाचीत अध्यक्ष समार खडस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार विकास महाडिक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश महाडिक यांनी केले.
मधू कांबळे यांची पत्रकारिता मी जवळून पाहिली आहे. समाजाचे ज्वलंत प्रश्न आंदोलन मोर्चे दलीत समाज आदी सर्व विषयावर त्यांची पत्रकारिता होती.असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी काढले.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना मधू कांबळे म्हणाले, पत्रकार दिनू रणदिवे यांच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पत्रकार दिनू रणदिवे यांच्यासोबत किमान तीन वेळी तरी भेटीचा योग आला. त्यामधून ही व्यक्ती आपल्या पत्रकारितेशी किती एकनिष्ठ होती याचा प्रत्यय आला. कोणत्याही बातमीचा वेध घेऊन तीची पाळेमुळे शोधून तीची मांडणी करणे याबाबत रणदिवे यांचा कटाक्ष असे. कदाचित यामुळेच रिडल्स आणि हुतात्मा चौक प्रकरणी राज्यात घडवून आणण्यात येणारी दंगल रणदिवे यांच्या लेखणीमुळे शांत झाली. ते पुढे म्हणाले, मी पत्रकारितेच्या नोकरीतून निवृत्त झालो आहे. पत्रकारितेतून नाही. सरन्यायाधीश ज्यावेळी असे म्हणतात की, भारताच्या न्याय व्यवस्थेला धोका आहे. तेव्हा त्या विधानाची रॉ किंव्हा सी बी आय मार्फत चौकशी झाली पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही. म्हणून आज देशाची बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी सज्जनांनी सक्रिय होण्याची गरज आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, पत्रकार दिनू रणदिवे यांच्या बँक खात्यात किती रुपये होते यापेक्षा त्यांनी त्यांच्या जीवनात करोडो माणसे जोडली व माणसांची बँक जोपासली म्हणून आज या पुरस्कार सोहळ्यात एवढी गर्दी झाली आहे. दिनू रणदिवे आमच्या विचारात ३६५ दिवस आहेत. पत्रकारांना त्यांचे आज जे काही हक्क अधिकार मिळत आहेत ते दिनू रणदिवे यांच्यामुळेच मिळत आहेत.
प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष गूरबिर सिंग म्हणाले, भविष्यात पुरस्कार देण्यासाठी चांगले पत्रकार मिळतील का ? कुठे चालली आहे आजची पत्रकारिता ? असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. उत्तर प्रदेश मध्ये चार हजार यु टुब वर बातम्या देणाऱ्या संपादकांची मुस्कटदाबी केली गेली . मात्र त्यानंतर आठ हजार नवीन यु टुब वर बातम्या देणारे संपादक निर्माण झाले.
गेल्या दोन तीन महिन्यापासून संविधान बाबतची सुरू असलेली चर्चा मी ऐकत होतो. मात्र संविधानाची हत्या कुणीही करू शकत नाही असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला. धर्माधिकारी म्हणाले, वृत्तपत्राची पाहिली तीन चार पाने का वाचावीत असा प्रश्न पडला आहे. महापुरुष छोट्या कारणावरून भांडत नव्हते. त्यांचे लोकांवर प्रेम होते. त्यांचे योगदान फोल ठरत असल्याचे आज वातावरण तयार झाले आहे. संपादक पदी बढती मिळण्यापेक्षा दिनू रणदिवे यांना मिळालेला हा मान त्यापेक्षाही मोठा आहे असे धर्माधिकारी म्हणाले.
0 टिप्पण्या