नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चांगलाच गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणेकर असल्याने त्यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष घातले आणि दोषी अधिकाऱ्यांना तुरुंगात टाका, असे स्पष्ट आदेशच दिले. परंतु हा केवळ बोलघेवडेपणा ठरला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात, खालचे निर्ढावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अद्यापही या प्रश्नावर ठाणे महानगर पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिका प्रशासनाच्या ताब्यात असल्याने कोणतीही महासभा यावर आवाज उठवू शकत नाही. त्यातच आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आचारसंहितेचा काळ आहे. अशा वेळी कोणी काही कारवाई करीत नाही. सर्व अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असतो. त्याचा फायदा घेत ठाण्यात अनधिकृत बांधकामांना पुन्हा उधाण आले आहे. ठाण्यातील माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुम साकेत रोड वर अवैध इमारतीचे अनधिकृत बांधकाम खुले आम सुरु आहे. रस्त्याच्या कडेलाच असणारे बांधकाम कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत.
0 टिप्पण्या